आमगावसह भंडारा, तुमसर रेल्वे स्थानकाचे होणार कायापालट, खा.प्रफुल पटेल यांच्या पाठपुराव्याचे फलित

940 Views

 

गोंदिया : केंद्र शासनाच्या रेल्वे मंत्रालयाने देशातील रेल्वे स्टेशन अधिक सुविधायुक्त होवून आधुनिक व्हावे, यासाठी अमृत भारत स्टेशन योजना हाती घेतली. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात गोंदिया रेल्वेस्थानकाचा समावेश करण्यात आला होता. त्याचबरोबर भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील इतर रेल्वेस्थानकांचेही कायापालट व्हावे, यासाठी खा.प्रफुल पटेल यांनी प्रयत्न केले. दरम्यान या योजनेच्या दुसर्‍या टप्प्यात गोंदिया जिल्ह्यातील आमगाव व भंडारा येथील वरठी तसेच तुमसर रेल्वे स्टेशनचा समावेश करण्यात आला आहे. यानुरूप रेल्वे प्रशासनाने तिन्ही स्थानकांचा कायापालट करण्याचे नियोजनही केले आहे. त्यामुळे गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील जनतेचा रेल्वे प्रवास आणखी सोयीस्कर होणार आहे.

रेल्वेच्या अमृत भारत स्टेशन अंतर्गत ऑगस्ट २०२३ मध्ये पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरातील १२०० रेल्वे स्थानकाचा कायापालट करण्याच्या योजना आखण्यात आली. तसेच अंमलबजावणीही सुरू झाली. योजनेच्या पहिल्या टप्प्यात दक्षिण -पुर्व -मध्य रेल्वे विभागाच्या नागपूर मंडळातील गोंदियासह पुर्व विदर्भातील काही रेल्वे स्थानकाचा समावेश करण्यात आला होता. यानुरूप गोंदिया रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण व सौंदर्यीकरणाचे काम देखील सुरू झाले आहे. दरम्यान गोंदियासह जिल्ह्यातील तसेच भंडारा जिल्ह्यातील इतर रेल्वे स्थानकही सुविधाजनक व आधुनिक व्हावेत, यासाठी खा.प्रफुल पटेल यांनी पाठपुरावा सुरूच ठेवला. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री श्री अमित शाह व रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव यांच्याशी सतत संपर्कात राहून भंडारा, तुमसर व जिल्ह्यातील आमगाव या रेल्वे स्थानकांना अमृत भारत योजनेत समाविष्ट करवून घेतले. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने योजना अंमलबजावणीच्या दुसर्‍या टप्प्यात आमगाव, भंडारा व तुमसर या रेल्वे स्थानकाचा समावेश करून निधी उपलब्ध करून दिला आहे. या तिन्ही रेल्वे स्थानकाचा कायापालट करण्याच्या उद्देशाने आकर्षक नकाशा देखील तयार करण्यात आला आहे. रेल्वे स्थानकाच्या दोन्ही बाजुला सीटी सेंटर, स्वयंचलित पायरीसह अनेक दर्जेदार कामे व सोयीसुविधा उपलब्ध करून देणार आहेत. यामुळे खा.प्रफुल पटेल यांनी देशाचे यशस्वी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री श्री अमित शाह व रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहे.
……………………….
खा.पटेलांनी शब्द पाळला
अमृत भारत योजनेत गोंदिया रेल्वे स्थानकाचा समावेश करण्यात आला होता. त्यानुरूप योजनेची अंमलबजावणी सुरू झाली. दरम्यान खा.प्रफुल पटेल यांनी गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील इतर रेल्वे स्थानकांचा कायापालट करू, त्या अनुसंगाने केंद्र सरकारशी पाठपुरावा करणार, असे शब्द दिले होते. ते शब्द खा.प्रफुल पटेल यांनी पाळले. परिणामी गोंदिया जिल्ह्यातील आमगाव व भंडारा जिल्ह्यातील वरठी (भंडारा रोड), तुमसर हे तिन्ही रेल्वेस्थानक नव्या स्वरूपात पहावयास मिळणार आहेत.
…………………..
अशी होणार कामे

अमृत भारत स्टेशन अंतर्गत समावेश करण्यात आलेल्या रेल्वेस्थानकांचे कायापालट होणार आहे. या योजनेतंर्गत रेल्वेस्थानक परिसराचे सुशोभिकरण, बाग निर्मिती, आकर्षक व सुसज्ज इमारत, पार्किग व्यवस्था, हायमास्ट लाइट, दिव्यांग व ज्येष्ठाकरीता लिफ्ट, कॉनकोर्स विकास, भुवनेश्वर मॉडलचे शौचालय तसेच सी.सी.टी.व्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत.
००००००००००००००

Related posts